Published in Maharashtra Times 02nd August 2026
...एकमेकांशी संभाषण करीत असल्यासारखे थोड्या थोड्या वेळाने हॉर्न्स वाजत असतात, रस्त्यावरचे विक्रेते ‘वडा पाव’ किंवा ‘कटिंग चाय’च्या आरोळ्या ठोकत असतात आणि एखाद्या टॅक्सीतून रेडिओवर सुरू असलेल्या हिंदी गाण्याच्या ओळी तरंगत येत असतात...
गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात आमची अवघी दीड वर्षाची मुलगी राया एका गोष्टीच्या प्रेमात पडली आणि ते म्हणजे आरतीचे सूर. प्रत्येक वेळी आरती सुरू झाली की तिचे डोळे आनंदाने चमकायचे. तिचे इवलेसे हात आपोआप त्या तालावर टाळ्या वाजवू लागायचे आणि समोर चालू असणारा प्रत्येक मंत्र, संपूर्ण पूजाविधी या सगळ्यात ती अतिशय तन्मयतेनं सहभागी व्हायची. पण हे त्याहून संस्मरणीय व्हायचं ते आरती संपल्यावर जे घडायचं त्यामुळे. आरती संपली तरी रायाची थांबायची तयारी नसायची. ती आमचा हात धरुन ‘पुन्हा आरती करा’ असा निरागस हट्ट करायची. मग पुन्हा एकदा... आणि पुन्हा एकदा. तिची आर्जवे थांबतच नसत.
उत्सवाच्या त्या काही दिवसांमध्ये, केवळ तिला आरतीचे सूर आवडताहेत म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा आरती म्हणायला सुरुवात केली. तिला काही आरतीच्या शब्दांचा अर्थ कळत नव्हता, पण तिला आरतीचा ‘आवाज’ नक्कीच आवडत होता. तिला त्याचा आनंद घेताना पाहून एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे लहान मुलं शब्दांची ओळख होण्याआधी प्रतिसाद देतात तो एखाद्या ऱ्हिदमला. शब्दांचे अर्थ कळण्याआधी त्यांना आवाजाची ओळख होते. आणि कदाचित भारताच्या बाबतीतही हेच खरं आहे. असे काही विशिष्ट आवाज असतात जे काहीही न बघतासुद्धा क्षणार्धात तुम्ही नेमके कुठे आहात हे सांगून टाकतात. ते आवाज म्हणजे त्या त्या ठिकाणाची ओळख असतात आणि हेच तर भारताचं वैशिष्ट्य आहे.
आपल्या देशाचं वर्णन अनेकदा व्हायब्रंट, रंगीबेरंगी आणि गजबजलेला देश असं केलं जातं. पण त्यामुळे आपण अनेकदा हे विसरतो की भारत हा कानांनी ऐकण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा सुद्धा देश आहे. इथे प्रार्थनेपासून बाजारापर्यंत, प्रवासापासून सेलिब्रेशन्सपर्यंत आणि प्रत्येक ऋतुसाठी एक वेगळी सुरावट ऐकायला मिळते. या सुरावटींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सूर आपल्या मनात कायम रेंगाळत राहतात. मग अनेक वर्षांनी जरी एखादा घंटेचा आवाज किंवा रेल्वेची शिट्टी किंवा ढोलांचा आवाज ऐकला तरी आपलं मन लगेच भूतकाळात पोहोचतं.
आजचा हा लेख अशाच आवाजांविषयी आहे, जे भारताची ओळख बनले आहेत. ज्यांमध्ये आठवणी दडलेल्या आहेत आणि जे ऐकताक्षणी आपण नेमके कुठे आहोत याची जाणीव हो ते. काही देश तिथल्या फोटोग्राफ्समधून आपल्या स्मरणात राहतात, पण भारत मात्र लक्षात राहतो तो इथल्या आवाजांनी.
श्रद्धेचा नाद
फक्त भारतातच हमखास ऐकू येतो असा आवाज कोणता? असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असेल मंदिरांतील घंटानाद. खरंतर हा अगदी साधा आवाज आहे, पण भारतात हा आवाज स्वतःसोबत एक संपूर्ण वातावरण घेऊन येतो. पहाटेच्या वेळी कोणत्याही परिसरातून फेरफटका मारताना जवळपासच्या एखाद्या मंदिरातून हा आवाज नक्की कानावर पडतो आणि कळतं की आतमध्ये पूजा सुरू आहे. दैनंदिन जीवनातील गोंगाट भेदून जाणारा हा घंटानाद कानावर पडला की तात्काळ त्या परिसराचं संपूर्ण वातावरणच पालटतं.
या अनुभवाची तीव्रता मला जाणवली ती ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटावर. रोज संध्याकाळी सूर्य अस्ताला जाऊ लागला की गंगेच्या पाण्यावर दिव्यांचा मंद प्रकाश झळकू लागतो आणि आरती सुरू होते. पुजारी घाटावर एकत्र येतात,भाविक घाटाच्या पायऱ्यांवर बसतात आणि हळूहळू एक ध्वनी निर्माण होऊ लागतो. मंत्रोच्चारांनी सुरुवात होते, त्यात घंटानाद मिसळतो आणि मग नदीच्या पैलतीरापर्यंत जाणारा शंखनाद होतो. या अनुभवाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तुम्ही आरती फक्त ऐकत नाही, तर अनुभवता. मंत्रांच्या चालीवर घंटा खणखणत असतात, बाजूने नदी शांतपणे वाहत असते आणि मग काही क्षणात सगळा घाटच त्या नादाने निर्माण केलेल्या भावनिक लहरींमध्ये गुरफटतो.
तुम्ही जरी तिथे होणारी आरती फक्त पाहायला म्हणून गेलेले असलात तरीही तो नाद तुम्हाला तुमच्याही नकळत त्या वातावरणात सामावून घेतो. मग कधी तुम्ही त्या ऱ्हिदमचा भाग बनता आणि फक्त प्रेक्षक न राहता त्या अनुभवात चिंब भिजता हे तुमच्याही लक्षात येत नाही. भारतातील श्रद्धेचं हेच तर आगळेपण आहे. ती सहसा चार भिंतींमध्ये अडकून पडत नाही. मंदिरातील नाद बाहेर रस्त्यांवर उमटतो, नदीच्या पल्याड पोहोचतो, वस्त्यांमध्ये पोहोचतो. मग प्रार्थनेसाठी न थांबणाऱ्या लोकांनाही हा नाद वेढून त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा हिस्सा बनतो आणि अशा रीतीने तो सगळ्यांच्या परिचयाचा होतो.
म्हणून तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या मंदिरातील घंटानाद कानावर पडला तरी तो सगळ्यांना ओळखीचा वाटतो. कदाचित म्हणूनच रायालाही घरच्या गणपतीची आरती इतक्या मनापासून आवडली. धार्मिक विधी कळण्याचं तिचं वय नाही, पण तिला ऱ्हिदम मात्र अचूक कळला आणि भारतात तर आपण इतर कोणत्याही आवाजाआधी हा प्रार्थनेचा ऱ्हिदम ओळखायला शिकतो.
प्रवासाचे आवाज
भारतात जर मंदिरातील घंटानाद हा श्रद्धेचा आवाज असेल, तर ट्रेनची शिट्टी हा प्रवासाचा आवाज आहे. स्टेशनात शिरणाऱ्या रेल्वे गाडीच्या त्या लांबलचक, कर्णकर्कश्य शिट्टीच्या आवाजात जितक्या आठवणी दडलेल्या असतात, तितक्या या देशातल्या कुठल्याच आवाजात नसतील. ट्रेन प्रत्यक्ष दिसायच्या कितीतरी आधी हवेवर प्रवास करीत, तो शिट्टीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. अनेकांसाठी तो आवाज म्हणजे प्रवासाचा, साहसाचा किंवा रियुनियनचा सिग्नलच असतो.
मला तो आवाज थेट माझ्या बालपणात घेऊन जातो. मी लहान असताना माझी आई हिमाचल प्रदेशच्या टूरवर जायची, तेव्हा मी अनेकदा तिच्यासोबत जायचो. त्या ट्रिप्समध्ये मुंबईहून दूरचा रेल्वे प्रवास करावा लागायचा. अनेकदा तो राजधानी एक्सप्रेसने व्हायचा. या नावाची एक्साइटमेंट आजही माझ्यासाठी तितकीच ताजी आहे. त्या काळी तर राजधानी एक्सप्रेसचा दिमाख काही औरच असायचा. अधिक वेगवान, अधिक चकाचक आणि इतर कोणत्याही ट्रेन्सपेक्षा अधिक महत्त्वाची, खास अशी ही ट्रेन जादुई वाटायची. पण माझ्या रेल्वेच्या काही खास आठवणी या माझा प्रत्यक्ष प्रवास सुरू होण्याआधीच बनलेल्या आहेत. माझे आजोबा काहीवेळा मला फक्त ट्रेन्स दाखवायला स्टेशनवर घेऊन जायचे. आम्ही दिल्लीहून येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थांबलेलेो असायचो. त्यात सर्वात आधी कानावर पडायचा तो दूरवरून येणाऱ्या गाडीच्या शिट्टीचा लांबलचक, न सरता येणारा आवाज.
भारतातली रेल्वे स्टेशन्स अजिबात शांत नसतात, ती कायमच आवाजांनी गजबजलेली असतात. डोक्यावर घुमणाऱ्या अनाउन्समेंट्स, गार्डांनी फुंकलेल्या शिट्ट्या, एकाच वेळी शेकडो लोकांच्या बोलण्याचा गोंगाट... असा सगळा माहौल असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके असूनही तो गोंधळ वाटत नाही. आणि एकदा का ट्रेन सुरू झाली की हा ऱ्हिदम आपोआप बदलतो. रेल्वेच्या पटरीवरचा चाकांचा धडक धडक हा आवाज जणू तुम्हाला भारून टाकतो. हिप्नॉटाईज करतो. ही रेल्वेतल्या रात्रीच्या प्रवासांची सुरावट आहे. खिडकीतून दिसणारे बाहेरचे धावते लाइट्स, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना वाटेत लागलेली शांत झोप, हे सगळं या आवाजात सामावलेलं आहे. म्हणूनच रेल्वेच्या शिट्टीचा आवाज मला अस्सल भारतीय वाटतो, कारण तो फक्त वाहतूकीच्या साधनांचा आवाज नाही, तर तो आठवणींचा आवाज आहे.
रस्त्यांचे आवाज
भारतातल्या जवळपास कोणत्याही रस्त्यावर पाऊल ठेवताक्षणी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इथलं जीवन क्वचितच शांत असतं. पण गमतीचा भाग हा आहे की बाहेरुन आलेल्यांना जो इथला ‘गोंगाट‘ वाटतो, तोच इथल्या स्थानिकांसाठी मात्र काही वेगळा अर्थ घेऊन येतो. आमच्यासाठी तो गोंधळ नसतो, तर त्यात एक लय असते. आमचं रोजचं जगणं जणू त्या लयीवर सुरू असतं.
याचा सर्वोत्तम अनुभव घ्यायची जागा म्हणजे आपल्या शहरांमधली मार्केट्स. ओल्ड दिल्लीमधील एखादी संध्याकाळ आठवा किंवा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील फेरफटका. तुम्ही तिथे पाऊल टाकताच तुमच्या डोळ्यांप्रमाणेच कानसुध्दा गर्क होतात. विक्रेते त्यांच्या खास कमावलेल्या आवाजात भाज्यांचं ताजेपण तुमच्या मनावर ठसवण्यासाठी ओरडत असतात. एखादा फळवाला टिपेच्या सुरात त्याच्याकडच्या फळांची नावं सांगत असतो. एखाद्या चहाच्या टपरीवरुन ‘चाय चाय’ अशी साद ऐकू येते आणि याच्या बॅकग्राऊंडवर किटलीची शिट्टी वाजते. या सगळ्या आवाजांनी वातावरण एकदम जिवंत होऊन जातं.
मुंबईच्या रस्त्यांवर या सुरावटीची वेगळी आवृत्ती ऐकायला मिळते. इथला वेग अधिक आहे आणि आवाज अधिक तीव्र. एकमेकांशी संभाषण करीत असल्यासारखे थोड्या थोड्या वेळाने हॉर्न्स वाजत असतात, रस्त्यावरचे विक्रेते ‘वडा पाव’ किंवा ‘कटिंग चाय’च्या आरोळ्या ठोकत असतात आणि एखाद्या टॅक्सीतून रेडिओवर सुरू असलेल्या हिंदी गाण्याच्या ओळी तरंगत येत असतात. त्यातच एखाद्या स्टेशनवर येणाऱ्या लोकलच्या ब्रेकचा धातूवर चरे ओढल्यासारखा कर्कश्य आवाज मिसळतो आणि मग जाणवतं की हे शहर त्याच्या स्वतःच्याच एका खास लयीत धावतंय.
भारतात पहिल्यांदाच येणाऱ्या व्यक्तींवर या सतत सुरू असलेल्या आवाजांचं दडपण येऊ शकतं. पण जे इथेच जन्मले, वाढले आहेत त्यांच्यासाठी ते तसं नसतं. त्यांच्यासाठी हे आवाज म्हणजे रोजच्या जगण्याचं पार्श्वसंगीत असतं. खरं तर, जर रस्ते अचानकपणे शांत झाले, सगळे आवाज थांबले तर तेच फार विचित्र वाटतं, चुकचुकल्यासारखं वाटतं.
सेलिब्रेशनचा आवाज
या देशातील कोणतंही सेलिब्रेशन सहसा शांत नसतंच. मग ती लग्नाची वरात असो, धार्मिक उत्सव असो किंवा एखादा सामुदायिक कार्यक्रम, या प्रत्येक उत्सवाच्या केंद्रस्थानी आवाज असतो. ढोल-ताशांचा गजर सुरू झाला की अनेकांचे आवाज त्यात मिसळतात आणि बघताबघता संपूर्ण रस्ताच जणू एक रंगमंच बनतो, जिथे प्रत्येकजण त्या सादरीकरणाचा एक भाग असतो.
मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची मिरवणूक दिसण्याआधीच ऐकू येते. ढोल-ताशे त्या मिरवणुकीला केवळ साथ देत नाहीत, तर ते मिरवणुकीचं नेतृत्व करतात. त्यांचा ताल गर्दीच्या पावलांना दिशा देतो आणि मग काही क्षणांसाठी संपूर्ण शहरच जणू त्या ठेक्यावर नाचत असल्याचा भास होतो.
काही हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलकाता शहराची दुर्गापूजेच्या काळातली ओळख म्हणजे ‘ढाक’चा आवाज. या पारंपरिक ढोलांचा ऱ्हिदम सुरवातीला संथ असतो, हळूहळू तो वाढत जातो, आणि मग सगळ्यांना वेढून टाकणाऱ्या एका शक्तिशाली लयीत त्याचं रूपांतर होतं. दुर्गा पूजेच्या काळात तिथल्या कोणत्याही मांडवाजवळून जाताना हा ऱ्हिदम लगेच कानावर पडतो. सगळ्या परिसरात तो ढोलांचा घनगंभीर नाद घुमत असतो, त्यात शंखनाद आणि मंत्रोच्चाराबरोबरच एका मांडवातून दुसरीकडे जाणाऱ्या उत्साही लोकांच्या बोलण्याचा आवाजही मिसळलेला असतो.
पण भारतातलं सणांचं सेलिब्रेशन फक्त आखीवरेखीवच नसतं. होळी खेळताना गाणी म्हणणारी मुलं, लग्नाच्या वरातीत ब्रास बँडच्या तालावर नाचणारे नातेवाईक किंवा एखाद्या सणाच्या वेळी एखादी मूर्ती मंडपाकडे नेतानाच्या मिरवणूकीत उत्स्फूर्ततेनं सामील होऊन घोषणा देणारा त्या परिसरातला जनसमुदाय... हे सगळे कोणत्या ना कोणत्या उत्सवाचाच आवाज असतात. या आवाजांची खासियत म्हणजे ते प्रॅक्टिस करुन पॉलिश केलेले नसतात. ते अगदी नैसर्गिक असतात, उर्जेनं भारलेले असतात, आणि सामुदायिक असतात. भारतातील सेलिब्रेशन्स तुम्ही कोपऱ्यात उभे राहून फक्त पाहूच शकत नाही. यांचं संगीत रस्त्यावर पसरू लागलं की आपोआप तुम्ही त्यात ओढले जाता आणि काही कळायच्या आत त्या सेलिब्रेशनचा भाग बनून जाता.
पावसाचा आवाज
ज्या कोणी भारतातील मान्सूनचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना पहिल्या पावसाचा आवाज क्षणार्धात ओळखता येतो. पहाडांमध्ये हा आवाज अधिक प्रभावी वाटतो. पत्र्याच्या छपरावर, झाडांच्या शेंड्यांवर, पायाखालच्या मातीवर, असा सगळीकडे तो ऐकू येतो. पहाडांमधून या आवाजाचे जे प्रतिध्वनी येतात, त्यामुळे संपूर्ण व्हॅली जिवंत झाल्यासारखी वाटते. शहरांच्या गजबजाटापेक्षा किंवा उत्सवांच्या जल्लोषापेक्षा पावसाच्या आवाजाचा परिणाम अगदी वेगळा असतो. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचा वेग मंदावतो. गप्पा थांबतात, लोकं आडोशाला उभी राहतात. काही क्षणांसाठी रस्ते ओस पडतात आणि सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून राहतात. असं असलं तरीही त्याच्यामुळे कधी उदास वाटत नाही. भारतात पावसाचं स्वागत एखाद्या उत्सवासारखंच केलं जातं. उन्हाळ्यानंतरचा गारवा, हिरवागार निसर्ग आणि एका नवीन ऋतूचा आरंभ यामुळे पावसाचं कायम स्वागतच केलं जातं.
कदाचित म्हणूनच पावसाचा आवाज आपल्यापैकी अनेकांच्या मनात अनेक आठवणी जागवतो. बालपणी गॅलरीत उभे राहून पावसाच्या सरी पाहिलेल्या दुपारी, अचानक कोसळणाऱ्या पावसात चहा आणि भज्यांचा घेतलेला आस्वाद किंवा डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये कोणतीही चाहूल न देता धुक्यासोबत येणारा पाऊस... असे सारे क्षण पावसाच्या आवाजाशी कायमचे जोडले गेलेले असतात.
तुमच्यासोबत कायम राहणारे आवाज
या दृष्टीने जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की भारत जशी आपली ओळख विविध आवाजांमधून करुन देतो, तसं जगातल्या फारच कमी ठिकाणांना शक्य आहे. यातला प्रत्येक आवाज देशाच्या वेगवेगळ्या भागांशी आणि रोजच्या जगण्यातील वेगवेगळ्या क्षणांशी जोडलेला आहे. तरीही त्या सर्वांमध्ये एक खास, पण समान धागा आहे. हे आवाज ऐकताक्षणी आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत. कदाचित म्हणूनच आपला देश इतका संस्मरणीय आहे. हा केवळ रंग, लँडस्केप्स आणि ऐतिहासिक स्मारकांचा देश नाही, तो दैनंदिन आयुष्यात साथ करणाऱ्या आवाजांचा, लयींचा आणि प्रतिध्वनींचाही देश आहे. इथे श्रद्धा, प्रवास, सेलिब्रेशन्स, कामाच्या ठिकाणचे आवाज आणि निसर्गाचे स्वर सतत एकमेकांमध्ये मिसळत असतात. त्यातून एक अशी सुरावट निर्माण होते जी एकाच वेळी गोंधळाची आणि तरीही विलक्षण सुसंवादी वाटते. आणि एकदा का हे आवाज आपल्या आठवणींचा हिस्सा बनले की मग ते कधीच आपली साथ सोडत नाहीत, ते विसरता येत नाहीत. हीच तर भारतातल्या सुरावटींची जादू आहे. प्रवास संपल्यानंतर, उत्सव होऊन गेल्यानंतर आणि रेल्वे तिच्या पुढच्या प्रवासाला निघून गेल्यानंतरही हे आवाज आपल्या मनात रेंगाळत राहतात आणि आयुष्यभर साथ करणारी सूर व लयीची एक संस्मरणीय मैफल सजवून जातात. पुन्हा भेटूया, पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!


























































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.