Published in Maharashtra Times 12th July 2026
...सहजच कुणीतरी रचून ठेवल्यासारख्या मोठमोठ्या शिळा, सपाट
मैदानातून अचानक उभे राहिलेले पर्वत आणि या सगळ्या प्रदेशातून
ठामपणे वळणं घेत वाहणारी तुंगभद्रा नदी... हा सगळा परिसर अतिशय
प्राचीन, नाट्यमय आणि सामर्थ्यशाली वाटतो...
काही महिन्यांपूर्वी मी आणि आमची चीफ प्रॉडक्ट ऑफिसर सुनिलाने वीणा वर्ल्डच्या ‘व्हेअर टू नेक्स्ट’ या पॉडकास्टमध्ये ‘द रामायणा ट्रेल’ या रूटबद्दल गप्पा मारल्या. यात भारत, नेपाळ आणि श्रीलंका अशा तीन देशांमधल्या पर्यटनातून आम्ही रामायण महाकाव्याचा वेध घेतला. पौराणिक कथेपासून सुरू झालेलं आमचं बोलणं कधी पर्यटनाच्या अंगाने वळलं कळलंच नाही. मग पुराणकथेत वर्णन केलेल्या प्रदेशातून टप्प्याटप्प्याने पर्वतरांगा, अरण्ये, नद्या आणि किनारपट्टीवरुन हा प्रवास कसा करता येईल याविषयी आम्ही बोलू लागलो. आज आपणही ‘रामायण ट्रेल’ हा प्रवासाचा एक मार्ग म्हणून पाहणार आहोत. एक असा प्रवास जो टप्प्याटप्प्यात करता येतो किंवा दीर्घ प्रवास म्हणून सलगही करता येतो. हे महाकाव्य वेगवेगळ्या देशांमधील निसर्गसुंदर प्रदेशातून उलगडलं जातं. शिवाय या प्रवासातून लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमधला प्रदेश प्रत्यक्षात पाहिल्याचं समाधान मिळतं. चला तर मग, रामायणाच्या पाऊलखुणा शोधायला!
जनकपूर
प्रवासाचा एक मार्ग म्हणून रामायणाचा पाठपुरावा करताना एक मजेदार गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे या पुराणकथेच्या सुरुवातीच्या काळातील काही महत्त्वपूर्ण घटना या नेपाळमध्ये घडल्या आहेत. दक्षिण नेपाळमध्ये सपाटीवर वसलेलं ‘जनकपूर’ हे रामायणातील सीतेच्या वडिलांचं म्हणजे जनक राजाचं राज्य होतं असं मानलं जातं. अनेक पर्यटकांसाठी कदाचित ही अगदीच नवी माहिती असेल. भारतीय संस्कृतीच्या वस्त्राचे धागे ज्या रामकथेनं विणलेले आहेत त्या कथेतील महत्त्वाचा भाग हा आजच्या भारताच्या सीमेबाहेर, हे खरोखरच विस्मयकारक आहे.
जनकपूरच्या मध्यभागी सीतेला समर्पित असलेलं जानकी मंदिर आहे. शोभिवंत आणि शांत असं हे मंदिर या शहराचा भौगोलिक आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू आहे. जवळच राजवाड्याचे अवशेष आणि तो विवाह मंडप आहे, जिथे राम आणि सीतेचा विवाह संपन्न झाल्याचं मानलं जातं. या परिसरातून फिरताना रामायण ही काल्पनिक आख्यायिका वाटत नाही, तर ते गतकाळाची जिवंत आठवण बनतं. साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये येणाऱ्या रामनवमीला जनकपूर खऱ्या अर्थानं जिवंत होतं. उत्सवाच्या निमित्ताने राम-सीतेचा विवाह सोहळा पुन्हा साकारला जातो आणि तो बघायला भाविकांची गर्दी उसळते. उत्सवाचे दिवस नसताना सुद्धा या ठिकाणाची शांत आणि भक्तीमय लय आपल्याला शांतपणाचा अनुभव घेण्यासाठी आकर्षित करते.
मग रामायणाचा मागोवा घेणारा हा प्रवास वळतो दक्षिणेला अयोध्येकडे. ही रामजन्मभूमी म्हणजे या महाकाव्याचा आध्यात्मिक केंद्रबिंदूच.
रामजन्मभूमी
शरयू नदीच्या काठावरील अयोध्या नगरी हे श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे अनेक पर्यटकांसाठी ती रामायण ट्रेलचा भावनिक आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू आहे. शतकानुशतके या शहराच्या कथा सांगितल्या गेल्या, या शहराची गीते गायली गेली याची जाणीव झाल्यावर या शहराकडे बघण्याची आपली दृष्टीही बदलते. या शहरातला सर्वात मोठा लँडमार्क म्हणजे नव्याने उभारण्यात आलेलं रामजन्मभूमी मंदिर, जे आपल्या भव्यतेनं लगेच लक्ष वेधून घेतं. शेकडो फूटांच्या परिसरात पसरलेलं, उत्तर भारतातील नागरशैलीतील हे मंदिर जसं भव्य आहे त्याचप्रमाणे त्याच्या कोरीवकामातील तपशीलही आकर्षक आहेत. मंदिरात मध्यभागी बालरूपातील श्रीरामाची म्हणजे रामलल्लाची मूर्ती स्थापन केलेली आहे. हे बालरुप निवडण्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. हे महाकाव्य योद्धा किंवा सम्राटापासून सुरू होत नाही तर श्रीरामाच्या निरागसपणापासून सुरू होतं. रामनवमीच्या दिवशी मंदिरातील रामलल्लाला होणारा सूर्य तिलक म्हणजे या मंदिराचं खास वैशिष्ट्य. या मंदिरातील बांधकामाच्या रचनेत आरशांची रचना अशी केली आहे की त्यावरुन उगवत्या सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श करतात. वास्तुकला, खगोलशास्त्र आणि श्रद्धा याचा संगम इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
मंदिराच्या पलीकडची अयोध्या तुम्हाला शांतपणे थांबून काही क्षण अनुभवायला प्रवृत्त करते. शरयू नदीच्या घाटावरची संध्याकाळची आरती म्हणजे केवळ एक विधी नाही, तर एक अनुभवायलाच हवा असा क्षण असतो. पाण्यावर दिवे तरंगत असतात, मंत्रोच्चारांनी आसमंत भारलेला असतो आणि सगळं शहर जणू थांबून त्याचा आनंद घेत असतं.
इथून रामायण ट्रेल एक अधिक शांत, चिंतनशील वळण घेतो. आता आपली कथा, राजवाडे आणि सेलिब्रेशन्सपासून दूर जाऊ लागते. ती वळते वनवास आणि आत्मचिंतनाकडे, आणि ती आपल्याला चित्रकूट आणि नाशिकला घेऊन येते.
वनवासाचा काळ
रामायण ट्रेलमधील हा टप्पा प्रामुख्याने चित्रकूट आणि नाशिक या दोन ठिकाणांभोवती केंद्रित आहे. रामकथेमध्ये या जागांना विलक्षण महत्त्व आहे. मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरील चित्रकूट येथे राम, सीता आणि लक्ष्मणाने वनवासातील मोठा कालावधी घालवल्याचं मानलं जातं. आजही या परिसरातला निसर्ग भारून टाकणारा आहे. दाट वनराजी, संथपणे वाहणारं पाणी आणि विसावलेलं जीवन यामुळे या सगळ्या परिसरातच एक धीमी लय आहे जी जाणीवपूर्वक रुजवलेली वाटते. या परिसरातील सर्वात भावस्पर्शी जागा म्हणजे ‘राम-भरत मिलाप मंदिर’, जिथे राम आणि त्याचा बंधू भरत यांची ती भावपूर्ण भेट घडली होती. रामायणातील या प्रसंगातून कर्तव्य, संयम आणि गाढ बंधूप्रेम हे आपल्याला पाहायला मिळालं. जिथे ही भेट घडली होती असं मानलं जातं, त्या ठिकाणी उभं राहिल्यावर या सगळ्या मूल्यांचं महत्त्व मनावर अधिकच ठसतं. जवळच असलेल्या गुप्त गोदावरी गुंफांमुळे या अनुभवाला आणखी एक पदर जोडला जातो. या जागेवर नैसर्गिक रचना आणि तिचं आध्यात्मिक महत्त्व याचा संगम अनुभवता येतो.
चित्रकूटहून रामायण ट्रेल पश्चिमेच्या नाशिककडे, विशेषतः तिथल्या पंचवटीकडे वळतो. याच ठिकाणाहून रामायणाचा सूर नाट्यात्मकरित्या बदलतो. गोदावरीच्या कुशीत वसलेलं नाशिक ही अशी जागा आहे जिथे रामायणातील मध्यवर्ती संघर्ष घडला होता. वनवासाच्या काळात सीता जिथे राहात होती असं मानलं जातं ती ‘सीता गुंफा’ पर्यटक पाहू शकतात. तसंच काळ्या पाषाणातली मूर्ती जिथे आहे त्या काळाराम मंदिरालाही भेट देऊ शकतात. चित्रकूटमधील शांत वातावरणाच्या विरुद्ध पंचवटीत मात्र एक अदृश्य तणाव जाणवत राहतो. इथेच सीतेचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतरच या महाकाव्यातील घटनाचक्राला वेग मिळाला होता.
चित्रकूट आणि नाशिक ही दोन्ही ठिकाणं फक्त रामायणातच नव्हे, तर पर्यटकांच्या रामायण ट्रेल मध्येही एक महत्त्वाचं वळण ठरतात. इथे आपला ट्रेल भक्तीकडून नाट्यमयतेकडे आणि आत्मचिंतनाकडून दृढनिश्चयाकडे वळतो. इथून आपलं कथानक आणि पर्यटन दक्षिणेतील एका अगदी अनोख्या प्रदेशाकडे वळतं. खडकाळ प्रदेशातील किष्किंधा नगरी म्हणजेच आजचं हम्पी आपली वाट पाहत असतं.
इथे किष्किंधा नगरी जिवंत होते...
जिथे पुराणकथा आणि भूगोल एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत असं रामायण ट्रेलवरचं ठिकाण म्हणजे ‘हम्पी’. उत्तर कर्नाटकातील खडकाळ प्रदेशात पसरलेलं आजचं हम्पी म्हणजेच रामायणातील किष्किंधा नगरी. वानरांच्या याच राज्यात वाली, सुग्रीव आणि हनुमान राहात होते. इथे पाऊल ठेवल्यावरच लक्षात येतं की ही जागा किती अनोखी आहे. सहजच कुणीतरी रचून ठेवल्यासारख्या मोठमोठ्या शिळा, सपाट मैदानातून अचानक उभे राहिलेले पर्वत आणि या सगळ्या प्रदेशातून ठामपणे वळणं घेत वाहणारी तुंगभद्रा नदी... हा सगळा परिसर अतिशय प्राचीन, नाट्यमय आणि सामर्थ्यशाली वाटतो. रामायणातील जो कथाभाग इथे घडला त्यासाठी हा अगदी योग्य असा परिसर आहे. इथलं सर्वात लक्षणीय स्थळ म्हणजे ‘अंजनाद्री पर्वत’ जिथे हनुमानाचा जन्म झाला होता असं मानलं जातं. वरती पोहोचण्यासाठी डोंगर चढायला लागतो, पण वर गेल्यावर दिसणारं दृश्य त्या मेहनतीचं सार्थक करणारं असतं. त्या उंचीवरुन भोवतालचा परिसर बघताना, हा परिसर सामर्थ्य, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक का बनला याची जाणीव होते.
इथली आणखी एक संस्मरणीय जागा म्हणजे ‘हजार राम मंदिर’. यालाच ‘दगडात कोरलेलं रामायण’ म्हणूनही ओळखतात. या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर रामायणातले प्रसंग अगदी तपशीलवार कोरलेले आहेत. त्यामुळे हे सगळं मंदिरच आपल्याला या कोरीवकामातून रामायण दाखवतं. हे कोरीवकाम बघत चालताना असं वाटतं की जणू हा सगळा परिसरच या एकेका पॅनलमधून रामकथा सांगत आहे.
इथून रामायण ट्रेल कथानकाच्या निर्णायक टप्प्यावर दक्षिणेकडे वळतो. केरळ आणि तमिळनाडूमधून येतो सागर किनाऱ्यावर. आता त्याग, भक्ती आणि लंकेत जाण्यासाठी समुद्र ओलांडणं या गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं.
समुद्राच्या दिशेनं कूच
जसजसा रामायण ट्रेल दक्षिणेकडे वळतो तसतसा परिसर, निसर्ग बदलू लागतो. जंगलाची जागा किनारपट्टी घेते, नद्या विस्तारतात आणि कथानक शिखराध्यायाकडे वळू लागतं. प्रवासाच्या या टप्प्यावर कथानकातील सर्वात भावनाप्रधान क्षण येतात, ज्यात त्याग, भक्ती आणि भविष्याची तयारी अनुभवायला मिळते. या मार्गावरील सर्वात लक्षणीय ठिकाण म्हणजे केरळमधील जटायू अर्थ सेंटर. इथे सीतेच्या रक्षणासाठी रावणाचा मुकाबला करणाऱ्या जटायूला मानवंदना देणारे भव्य, सुमारे 200 फूट लांबीचे जटायू शिल्प एका टेकडीवर उभारलेले आहे. अनेक स्मारके विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उभारली जातात, पण हे मात्र बलिदानाची गाथा सांगतं. या शिल्पात पंख पसरून धारातीर्थी पडलेल्या जटायूचे अखेरचे क्षण चितारलेले आहेत. त्यामुळे त्याच्यासमोर उभं राहिल्यावर धैर्य आणि निष्ठा या भावना मनाला खोलवर स्पर्शून जातात.
केरळमधून हा रामायण ट्रेल आपल्याला भारताच्या पूर्व किनाऱ्याकडे, तमिळनाडूमधील रामेश्वर येथे घेऊन येतो. या प्रवासातील भारताच्या भूमीतलं हे शेवटचं स्थान आहे. सागरातील बेटावर वसलेलं रामेश्वर हे अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थान आहे. रामायणानुसार याच जागेवर रामचंद्रांनी लंकाधिपती रावण - जो एक ब्राह्मण राजा होता, त्याच्या वधाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी शिवशंकराची पूजा केली होती. या शहराच्या मध्यभागी रामनाथस्वामी मंदिर आहे. हे मंदिर जगातील सर्वात लांबलचक कॉरिडॉरसाठी ओळखलं जातं. इथल्या उंचच उंच खांबांमधून चालत जाताना आपोआप एक लय सापडते आणि मन एकाग्र होतं. या मंदिरात 22 पवित्र विहिरी आहेत, रामचंद्राच्या भात्यातील बाणांचे त्या प्रतीक मानल्या जातात. यात्रेकरू एक धार्मिक कृत्य म्हणून या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतात.
रामेश्वरमच्या पलीकडेच रामायण ट्रेलमधील सर्वात वेधक गोष्ट आहे आणि ती म्हणजे ‘रामसेतू’, ज्याला ‘ॲडम्स ब्रिज‘ म्हणूनही ओळखतात. सॅटेलाइट इमेजनुसार इथे उथळ पाण्यातल्या चुनखडीच्या खडकांची रांग दिसते. वानरसेनेनं लंकेत जाण्यासाठी बांधलेल्या रामसेतूचे ते अवशेष आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आता पुढचा प्रवास भारत मागे सोडून समुद्रमार्गे श्रीलंकेकडे, म्हणजे रावणाच्या राज्यात जाण्याचा आहे. हा रामायण ट्रेलमधील अंतिम अध्याय आहे.
समुद्रापारची रावणाची भूमी - श्रीलंका
श्रीलंकेत प्रवेश करताच रामायण ट्रेल त्याच्या अंतिम आणि सर्वात वेगळ्या पर्वात प्रवेश करतो. आता भारतातील मंदिरे आणि सपाट भाग मागे पडलेले असतात. या आधीच्या परिसराच्या अगदी विरुद्ध असलेला निसर्ग म्हणजे धुक्याने भरलेले पर्वत, वॉटरफॉल्स आणि गर्द हिरवाई आपल्याला श्रीलंकेत पाहायला मिळते.
इथल्या ठिकाणांपैकी सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे ‘नुवारा एलिया’. ही तीच जागा आहे जिथे सीतेला बंदिवासात ‘अशोक वाटिकेत’ ठेवलं होतं असं मानलं जातं. आज या जागेवरील ‘सीता अम्मान मंदिर’ प्रसिद्ध आहे. डोंगराच्या कुशीत, थंड हवेत वसलेलं हे स्थान अगदी रमणीय आहे.
नुवारा एलियाहून हा ट्रेल ‘इला’ या निसर्गरम्य ठिकाणाकडे जातो. या परिसरातील वॉटरफॉल्स हे ‘रावणा फॉल्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि जवळच्या गुंफा या रावणाच्या महालाचा भाग असल्याचं मानलं जातं. तुम्ही या जागेकडे दंतकथा म्हणून बघा किंवा भौगोलिक स्थान म्हणून, पण ही जागा अतिशय जाणीवपूर्वक निवडलेली आहे हे नक्की. जरा उंचावरची, पटकन दिसू शकणार नाही अशी आणि खालच्या जगापासून तुटलेली.
प्रवासाच्या या टप्प्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे श्रीलंकेचं निसर्गसौंदर्य पुराणकथेत अगदी बेमालूम मिसळून गेलं आहे. इथलं लँडस्केप हे अधिक सौम्य, हिरवंगार आणि अधिक शांत-निवांत आहे. ट्रेलच्या याआधीच्या प्रकरणांमधील भव्यता आणि तीव्रतेसमोर हा विरोधाभास अधिकच उठून दिसतो.
श्रीलंकेतील फक्त रामायणातील ठिकाणांची सहल 7 ते 10 दिवसांची होते. त्यामुळे जराही घाई न करता पर्यटकांना विविध स्थानांना भेट देता येते. दोन ठिकाणांमधला प्रवास चहाच्या मळ्यांमधून वळणदार रस्त्यांनी आणि टेकड्यांवरुन होत असल्याने जिथे पोहोचायचे त्या स्थानांइतकाच रंजक असतो.
‘व्हेअर टू नेक्स्ट’ या पॉडकास्टसाठी गप्पा मारताना माझ्या आणि सुनिलाच्या एक गोष्ट लक्षात आली की पर्यटनामुळे लहानपणापासून एकलेल्या कथांचा खरा अर्थ समजायला मदत होते. आणि रामायण ही काही फक्त ऐकायची किंवा वाचायची गोष्ट नाही, तर टप्प्याटप्प्यात, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. बरं, त्यासाठी तुम्हाला सगळा ट्रेल एकाच वेळी करण्याची गरज नाही. त्यातल्या एखाद्याच ठिकाणाला भेट दिलीत तरी त्याचा अर्थ नव्याने उलगडायला लागतो. आणि हेच तर या प्रवासाचं खरं सौंदर्य आहे. तुम्ही जिथे आहात तिथे ही कथा तुम्हाला सामावून घेते आणि इतर उत्तम कथांप्रमाणेच हळूहळू आपले पैलू उलगडते. आजच्यापुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!






























Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.