Published in Maharashtra Times 30th August 2026
...लेहसारख्या ठिकाणाचं निसर्गदृश्य इतकं भव्य आणि प्रभावी असतं की सुरुवातीपासून तुमच्या अवतीभवती असलेले ते उत्तुंग पहाडच तुमच्या टूरचा सूर सेट करतात. तर मेलबर्नसारख्या शहरांमध्ये...
गेल्या काही वर्षांमध्ये, पर्यटनाच्या ज्या भागाकडे आपल्यापैकी बहुतेक जण दुर्लक्ष करतात त्या भागाकडे मी अधिक बारकाईने लक्ष देऊ लागलो आहे. हा भाग म्हणजेच एखाद्या नवीन देशात लँड झाल्यानंतरचा पहिला तास. आपल्या प्रवासाचं पहिलं पाऊलच म्हणा ना. पर्यटनामधला हा भाग असा असतो ज्याबद्दल आपण कसलंही नियोजन करीत नाही. इथे कुठलेही लँडमार्क्स नसतात, कोणाचाही गाइडन्स नसतो आणि काही ठराविक ॲक्टिव्हिटीज् नसतात, तरीही आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणाची ओळख होण्यासाठी या छोट्याशा काळाचीच खरी मदत होते. आजच्या लेखात त्या वेळेत नेमकं काय घडतं? आपण नेमकं काय पाहतो? एका नवीन वातावरणाला कसं सामोरं जातो? आणि ही अगदी सुरुवातीची निरीक्षणे, ही वाटतात त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची का असतात? हेच मी उलगडून सांगणार आहे.
कोणत्याही ठिकाणी गेल्यावरचा पहिला तास हा ट्रान्झिशनचा असतो. तुम्ही तुमचा नेहमीचा, ओळखीचा परिसर सोडलेला असतो, पण अजूनही नवीन वातावरणात सेटल झालेले नसता. विमानाचे दरवाजे उघडताक्षणी त्याची सुरुवात होते. सगळ्यात आधी जाणवतो तो हवेमधला बदल. जर बाली किंवा सिंगापूर असेल, तर तिथली दमट हवा किंवा लेह असेल तर तिथली विरळ, कोरडी हवा... ही हवाच तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी वेगळ्या ठिकाणी आला आहात.
तुम्ही जेव्हा एअरक्राफ्टमधून टर्मिनलकडे जाऊ लागता तेव्हा तुमच्या संवेदना तुमच्या विचारांपेक्षाही अधिक वेगाने काम करीत असतात. या टप्प्यावर कोणताही मागचा संदर्भ नसतो. इथे तुम्ही अनुभवांची तुलना करीत नसता किंवा अपेक्षा पडताळून बघत नसता. अनेकदा संपूण ट्रिपमध्ये मिळणाऱ्या अनुभवांपेक्षा हा पहिल्या क्षणाचा अनुभव सगळ्यात जास्त भावतो, कारण तो सर्वात जास्त अनबायस्ड असतो.
विमानतळावर चालताना: विमानतळावर प्रवेश करताच त्या देशाची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळते. लोक कसे वागताहेत, कसे वावरत आहेत, तिथल्या सिस्टिम्स कशा चालतात, एकूणच तिथलं वातावरण किती ऑर्गनाईज्ड किंवा गोंधळाचं आहे यातून त्या देशाचा चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. सर्वात पहिल्यांदा जाणवते ती तिथल्या कामाची गती. काही देशांमध्ये सगळ्याच गोष्टी अतिशय जलद गतीने आणि एफिशियंटली होताना दिसतात. उदाहरणार्थ, सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर प्रवेश केल्यावर लगेच तिथल्या वातावरणाची लय लक्षात येते. लोकांना कुठे जायचं ते माहिती असतं, अगदी सहजपणे रांगा लावल्या जातात आणि तिथल्या सगळ्या प्रोसेसेस इतक्या वेल ऑर्गनाईज्ड असतात की तुम्हाला थांबावं लागलं तरी तुम्हाला ते जाणवत नाही.
यापेक्षा अगदी विरुद्ध अनुभव मी आमच्या हनिमूनसाठी सेशेल्सला गेलो तेव्हा घेतला होता. तिथली लयच पूर्णपणे वेगळी होती. सगळं काही अतिशय आरामात सुरू होतं, लोक शांतपणे फिरत होते, कोणालाही कसलीही घाई नव्हती, वातावरण अगदी रिलॅक्स होतं. यात मला हे चांगलं आणि ते वाईट असं काहीच म्हणायचं नाही, तर दोन्हीकडचं वातावरण अगदीच वेगळं होतं हे सांगायचं आहे. या फरकामुळेच तर आपण जिथे पोहोचलो आहोत ते ठिकाण समजून घ्यायला मदत होते.
या पुढचा टप्पा म्हणजे दिसणारे साइन बोर्डस् आणि लोकांचं वागणं. एखादा देश परदेशी पर्यटकांसाठी किती सोपा आणि मैत्रीपूर्ण आहे याचा पहिला अंदाज तिथल्या साइन बोर्डस्च्या भाषेवरून बांधता येतो. बोर्डावरती विविध भाषा वापरलेल्या असतील तर इथे जगभरातून प्रवासी येतात हे लक्षात येतं आणि फलकावर जर सुस्पष्ट, नेमक्या खुणा असतील तर तिथली एफिशियन्सी आणि स्पष्टता दिसून येते. त्या ऐवजी जर या बोर्डांवर भरमसाठ माहिती असेल किंवा त्यावर भरपूर खुणांची गर्दी असेल तर असे बोर्ड फारच गोंधळून टाकतात. मात्र अशा लिहिलेल्या संवादापेक्षाही, न बोलता इथल्या लोकांनी केलेलं वर्तन अधिक महत्त्वाचं ठरतं. लोक रांगेत कसे उभे राहतात, ते आपली वेळ येईपर्यंत थांबतात का पुढे घुसायचा प्रयत्न करतात, एअरपोर्टचा स्टाफ औपचारिक आहे का मोकळेपणाने गप्पा मारतो आहे या छोट्या छोट्या गोष्टींमधून खास करुन इमिग्रेशनच्या वेळीच त्या देशाचा सूर लक्षात येतो.
काही वेळा इमिग्रेशनची प्रक्रिया अतिशय कोरडी, केवळ औपचारिक होते, जिथे फार काही संवाद होऊच शकत नाही. तर काही ठिकाणी यावेळी होणारं लहानसं संभाषणही इतकं आपुलकीयुक्त आणि स्वागतशील असतं की त्या देशाविषयी आपलेपणा वाटू लागतो. माझा अलीकडचा अनुभव सांगायचा, तर काही महिन्यांपूर्वी आम्ही स्पेनला गेलो होतो. तिथल्या इमिग्रेशन ऑफिसरने अपेक्षेप्रमाणे सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या आणि मग माझा पासपोर्ट मला परत देताना माझ्याकडे पाहून तो म्हणाला, “माझ्या देशात, स्पेनमधे, तुमचं स्वागत आहे. इथल्या टापासचा आस्वाद घ्यायला विसरू नका.” खरं तर एक साधीशी ओळ, पण त्यामुळे आमच्या आगमनाचा अनुभवच बदलून गेला.
जिथे पासपोर्टवर शिक्का मारताच प्रोसेस संपते, अशा अनुभवाच्या तुलनेत या वाक्याने आमच्या मनात एक उबदार भावना निर्माण केली आणि आपोआपच पुढच्या टूरसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं.
विमानतळावरचा गोंगाट किंवा शांततेमुळेही तो देश समजून घ्यायला मदत होते. जपान किंवा युरोपच्या काही भागांमधले एअरपोर्टस्, जिथे अगदी कमी अनाउन्समेंट्स होतात आणि वातावरण एकूणच शांत असतं, ते अधिक शांत आणि नियंत्रित वाटतात. याउलट अमेरिकेतील एअरपोर्टस् अधिक एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह वाटतात, कारण तिथे सतत अनाउन्समेंट्स सुरू असतात, माणसं एकमेकांशी बोलत असतात आणि सतत हालचाल सुरू असते. आणि हे सगळं आपण एअरपोर्टच्या बाहेर पाऊल ठेवण्याआधीच घडून गेलेलं असतं.
पहिली टॅक्सी: तुम्ही एअरपोर्टच्या बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर तुम्हाला त्या देशाचा खरा, कोणत्याही पडद्यामागे न लपलेला चेहरा बघायला मिळतो. बहुतेक सगळ्याच पर्यटकांचा टॅक्सी प्रवास इथून सुरू होतो. मला नेहमी वाटतं की कोणत्याही ट्रिपमध्ये त्या देशाची ओळख एअरपोर्टवरून हॉटेलकडे जाण्याच्या लहानशा प्रवासातच होते.
सगळ्यात आधी तुमचं लक्ष जातं ते तिथल्या रस्त्यांकडे. तिथलं ट्रॅफिक शिस्तबद्ध आहे का बेशिस्त? तिथली वाहनं लेन्स पाळतात की मनाला वाटेल तशी चालवली जातात? तिथले लोक सतत हॉर्न वाजवताहेत का तिथे एक अनोखी शांतता पसरलेली आहे? यावरून तो देश उलगडत जातो.
टोकियोसारख्या शहरात, नियंत्रित आणि शिस्तबद्ध ट्रॅफिकमुळे वाहन चालवणं हा अतिशय सुखद आणि सुरक्षित अनुभव ठरतो. याहून अगदी उलट अनुभव बँकॉकमध्ये मिळतो. तिथल्या भरपूर ट्रॅफिकमुळे, उत्साहामुळे आणि सतत घडणाऱ्या उत्स्फूर्त घटनांमुळे तिथली एनर्जी वेगळीच असल्याचं जाणवतं.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एअरपोर्टचं लोकेशन. काही एअरपोर्टस् शहरात असतात, तर काही शहरापासून दूर. जेव्हा हे अंतर जास्त असतं, तेव्हा आपण एअरपोर्ट इतका लांब का बांधला म्हणून वैतागतो खरं, पण जर वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं तर हे दूरचं अंतर म्हणजे एक संधीच असल्याचं लक्षात येतं.
या प्रवासामुळे शहरामध्ये शिरताना हळूहळू होणारा बदल लक्षात येतो. या शहराच्या परिघावरचा प्रदेश, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं विस्तारत आणि वाढत गेलंय हे सगळं समजून घ्यायची संधी मिळते. दोन वर्षांपूर्वी मी इस्तंबूलमध्ये गेलो होतो तेव्हाचा अनुभव मला अजून आठवतो. तिथला एअरपोर्टही शहरापासून दूर आहे. जो प्रवास अतिशय थकवणारा आणि कंटाळवाणा वाटला असता, तोच माझ्या तिथल्या आगमनानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरला. मी तो वेळ टॅक्सी ड्रायव्हरशी बोलण्यासाठी वापरला आणि त्याला विचारलं की मी तिथल्या वास्तव्यात कुठे काय खावं? आणि त्या संभाषणाचं रूपांतर खाण्याच्या यादीत झालं. टर्किश एग, सर्वात उत्तम कबाब आणि ऑथेंटिक टर्किश कॉफी कुठे मिळेल? अशा बऱ्याच गोष्टी मला त्यातून कळल्या. त्यामुळे हॉटेलला पोहोचेपर्यंत त्या शहराचा एक फूड मॅप माझ्या मनात तयार झाला होता, जो मला कुठल्याच गाईड बुकमध्ये मिळाला नसता.
पुढचा टप्पा असतो तो लँडस्केपशी साधलेल्या संवादाचा. लेहसारख्या ठिकाणाचं निसर्गदृश्य इतकं भव्य आणि प्रभावी असतं की सुरुवातीपासून तुमच्या अवतीभवती असलेले ते उत्तुंग पहाडच तुमच्या टूरचा सूर सेट करतात. तर मेलबर्नसारख्या शहरांमध्ये तिथला मोकळा अवकाश, रुंद रस्ते, विस्तीर्ण जागा आणि गोंधळाचा अभाव तुमच्या मनावर ठसा उमटवतो.
पहिला घास: या पहिल्या तासातच, एअरपोर्टवर, टॅक्सी प्रवासात किंवा हॉटेलवर पोहोचल्यावर असा क्षण येतो जेव्हा तुम्ही त्या ठिकाणचा पहिला घास किंवा पहिला सिप घेता. त्याचं काही नियोजन केलेलं नसतं आणि अनेकदा तो सिप अगदीच साधा असतो. माझ्यासारख्या अतिशय ‘फूडी’ आणि विशेषतः प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तिथल्या स्थानिक फ्लेवरचा शोध घेणाऱ्या माणसासाठी तर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. काही वेळा तर फक्त कॉफीनेही सुरुवात होते.
सिंगापूरसारख्या ठिकाणी तिथली पहिली कोपी, मग ती एअरपोर्टवरची असो किंवा रस्त्यावरच्या स्टॉलवरची, ती घेतल्यावर एकदम स्थानिक असल्याचा फील येतो. तिची चव वेगळी असते, बनवण्याची पद्धत आणि ती सर्व्ह करण्याची पद्धतही वेगळी असते, त्यामुळेच तो एक खास अनुभव बनून जातो. हा एक लहानसा तपशील सांगून जातो की तुम्ही आता आपल्या घरी नाही आहात.
याउलट मी जेव्हा जेव्हा जपानमध्ये लँड होतो, तेव्हा तेव्हा मी आपोआप एअरपोर्टवरच काहीतरी खायला शोधू लागतो. आत्तापर्यंत मी अनेकदा तिथे गेलो आहे. मग मी साधासा सुशी बॉक्स शोधतो किंवा तिथल्या कन्व्हिनियन्स स्टोअर्समध्ये आणि एअरपोर्टवरच्या किऑस्कवर मिळणाऱ्या, चटकदार स्नॅक्सपैकी काहीतरी घेतो.
अन्य काही ठिकाणी एखादं कोल्ड्रिंक, पटकन खाता येतील असे स्नॅक्स किंवा चेक इन केल्यानंतरचं पहिलं पूर्ण जेवण असं काहीही साधं असू शकतं. तुम्ही काय खाता यापेक्षा ते कशाचं प्रतिनिधित्व करतं हे महत्त्वाचं असतं. अनेकदा हाच तो पहिला क्षण असतो जेव्हा आपण थांबतो. त्या पहिल्या घासाबरोबर किंवा सिपबरोबर जरा संथावतो. शांतपणे बसून अवतीभवती बघतो आणि भोवतालचा नजारा अधिक सजगपणे समजून घेऊ लागतो. मग स्थानिकांचे खाण्यापिण्याचे रीतिरिवाज आणि एकूणच त्या ठिकाणाचा ऱ्हिदम तुम्ही जाणून घेऊ लागता. त्याच क्षणी ही गोष्ट स्पष्ट होते की आता तुम्ही त्या देशात फक्त पोहोचला नाही आहात, तर तुम्ही त्या देशाचा अनुभव घेऊन तिथे हळूहळू स्थिरावू लागला आहात.
जाणीव करून देणारा तो क्षण: त्या पहिल्या तासातच एक क्षण येतो, जो जाणीव करुन देतो की आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. अनेकदा जेव्हा आपल्याला याचं भान नसतं, तेव्हाच अगदी अनपेक्षितपणे आपण त्या ठिकाणी पोहोचतो. यातली मजेची गोष्ट ही, की त्या त्या ठिकाणाप्रमाणे तिथला तिथला हा क्षण वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. उदाहरणार्थ, न्यूझीलंडमध्ये तिथल्या भव्य निसर्गामुळे याची जाणीव अगदी क्षणात होते. तिथला मोकळा, विस्तीर्ण परिसर, लोकसंख्येची अगदी कमी घनता आणि शहरातील गजबजाटाचा अभाव हे सगळं तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगत असतात की तुम्ही आता अगदी वेगळ्या वातावरणात आहात.
स्वित्झर्लंडमध्ये ही गोष्ट तिथली शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रिसिजन यातून समोर येते. तिथला स्वच्छ परिसर, वक्तशीर वर्तन आणि तिथल्या अपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टींमुळे त्या देशाची कार्यपद्धती कशी आहे याचा अंदाज येतो, तर जर्मनीमध्ये हे लक्षात येतं ते तिथल्या एफिशियन्सी आणि रचनेमुळे. ट्रान्सपोर्ट सिस्टिम्सपासून ते लोक सार्वजनिक ठिकाणी कसे वावरतात या सगळ्यातून ते कळतं. फ्रान्स आणि स्पेनमध्ये हा बदल खासकरून सांस्कृतिक असतो. तिथली भाषा, रस्त्यावरचं जीवन, लोकांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे एका वेगळ्याच जगात आल्याची जाणीव होते. मला आठवतंय की स्पेनमध्ये एअरपोर्टच्या बाहेर पडल्यानंतर तिथल्या जगण्याचा ऱ्हिदम, रात्रीची उशिराची जेवणं, गजबजलेले रस्ते आणि अतिशय उठून दिसणारं फूड कल्चर यामुळे माझ्या मनावर एक गोष्ट चटकन ठसली की मी एका अशा ठिकाणी आहे ज्याला स्वतःची गती आणि आयडेंटिटी आहे.
थायलंडमधली एनर्जी यापेक्षा अगदी वेगळी असते. अधिक व्हायब्रंट, अधिक डायनॅमिक असते त्यात तिथलं रस्त्यावरचं जीवन, पर्यटन आणि स्थानिक संस्कृती अशा प्रकारे मिसळलेली असते की त्याचं वेगळेपण अगदी लगेच उठून दिसतं. अनेकदा हा क्षण दृश्यमान नसतो. कधी कधी तो लोकांच्या वर्तनातून, तर कधी बोलण्याच्या पद्धतीतून येतो किंवा गजबजाटतून किंवा त्याच्या अभावातून येतो. तुमचा प्रवास सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच तुमचं शरीर, तुमच्या भोवतालचा परिसर आणि तुमचं भान याचा ताळमेळ घातला जातो.
जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रिपचा ती ट्रिप होऊन गेल्यानंतर विचार करता तेव्हा फक्त तिथे पाहिलेले मॉन्युमेंट्स किंवा पॉइंट्स इतकंच ठळकपणे आठवत नाही, तर तुम्हाला तिथे पोहोचल्याचं फीलिंग कशामुळे आलं होतं हेही नेमकेपणानं आठवतं. त्या नवीन शहरातला पहिला प्रवास आणि तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी आला आहात याची जाणीव करुन देणारा तो क्षण, या सगळ्याची सुरुवात त्या पहिल्या एका तासात झालेली असते.
विशेष म्हणजे सगळ्या प्रवासातला हाच एक टप्पा असा असतो जो आपल्याकडून काहीच मागत नाही. फक्त तुम्ही त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहावं इतकीच त्याची अपेक्षा असते. तरीही बहुतेक प्रवासी हा टप्पा घाईघाईने पार करतात. घाईघाईने पुढे जाऊन, हॉटेलमध्ये चेक इन करायचं, आणि स्थलदर्शनाला सुरुवात करून ऑफिशिअली टूर सुरू करायची याकडेच अनेकांचा कल असतो. मात्र अशी घाई करून आपण प्रवासातील सर्वात प्रामाणिक आणि त्या ठिकाणाचे अंतरंग दाखवणारा क्षण गमावून बसतो.
पर्यटनाची सुरुवात त्या ठिकाणच्या पहिल्या स्थलदर्शनापासून होत नाही, तर ज्या क्षणी तुम्ही तिथे पोहोचता तेव्हापासून, त्यातही तुम्ही जेव्हा आसपासचा परिसर डोळसपणे न्याहाळू लागता तेव्हापासून होते. प्रत्येक देश स्वतःची ओळख अगदी वेगळ्या पद्धतीने करुन देतो. काही देश ताबडतोब ठळकपणे आपला प्रभाव टाकतात, तर काही तरलपणे हळूहळू तुमच्या मनात उतरतात. कोणताही देश पहिल्याच तासात त्याच्याविषयी सगळं काही सांगून टाकत नाही, मात्र त्याला कसं समजून घ्यायचं याचा रस्ता नक्की दाखवतो. म्हणूनच या रस्त्यावरून कायम डोळसपणे प्रवास करा. पुन्हा भेटूया पुढल्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.